रस्त्यावरील आईस्क्रीम, फालुदा व मलाई कुल्फीमधील अन्नभेसळ रोखा — नागरिकांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर हातगाडी, टाटा ACE व तत्सम वाहनांमधून आईस्क्रीम, फालुदा, मलाई कुल्फी, ज्यूस आणि शरबत यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसते. मात्र, या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

अनेक ठिकाणी विक्री होणाऱ्या या खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग, हानिकारक केमिकल्स, निकृष्ट दर्जाचे दूध, मावा, तेल व इतर साहित्य वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. याशिवाय स्वच्छ पाण्याचा अभाव, अस्वच्छ भांडी, केमिकलयुक्त बर्फाचा वापर आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि कुटुंबीय हे पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे हा विषय केवळ अन्नभेसळीपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे.

मराठी एकीकरण समितीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करत आहोत. संशयित खाद्यपदार्थांची प्रयोगशाळा तपासणी, विक्रेत्यांच्या परवान्यांची पडताळणी, दोषींवर कठोर कारवाई तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करणे अत्यावश्यक आहे.

या जनहिताच्या मोहिमेत आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. खाली दिलेल्या “ईमेल पाठवा” बटणावर क्लिक करून आपण थेट संबंधित अधिकाऱ्यांना आपली मागणी पोहोचवू शकता.

नागरिकांचा आवाज बुलंद झाला तरच अन्नभेसळ रोखता येईल. चला, सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आजच आपला सहभाग नोंदवा.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top